जळगाव ( प्रतिनिधी ) – गणपती नगरात इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या पाठीमागे माथेफिरूंनी एक कार व दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनला अज्ञात माथेफिरूंविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष मोहन तलरेजा ( वय – ४५) यांच्या मालकीच्या दोन दुचाकी (एमएच १९ डी आर ४४९८) व ( एम एच १९ डी झेड ६६९८) त्यानंतर प्रितम थारुमल बठेजा (वय – ५०) यांच्या मालकीची कार (एम एच १२ क्यू वाय १००७) मध्यरात्री जाळण्यात आली. ही वाहने घराच्या कंपाऊंडमध्ये लावलेली होती. तलरेजा यांचे भाडेकरु चंकी वालेचा यांना पहाटे तीन वाजता वाहने जळत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड केली. झोपलेले संतोष तलरेजा यांनी भाऊ सुशील यांना बोलावून जळत असलेली वाहने विझवली. त्यानंतर वाहने जाळणाऱ्याचा परिसरात शोध घेण्यात आला, मात्र संशयित फरार झालेला होता.
तलरेजा यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, रेवानंद साळुंखे व इतरांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. परंतु कुठेच काही मिळाले नाही. आधीच्या एका घटनेत विकृताने नशेत हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.