जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरूण भागातून अमळनेर येथे घरी जात असताना एका व्यक्तिला धरणगाव तालुक्यातील म्हसवे गावाजवळ अज्ञात दरोडेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याची दुचाकी आणि दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. या जबर दरोड्याप्रकरणी धरणगाव पोलीस तसेच एलसीबी पोलीस माहिती घेत असून जखमिवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय ३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण असे जखमी इसमाचे नाव आहे. सेंट्रींग कामाची ठेकेदारी करून उदरनिर्वाह करतो. तो अमळनेर येथे त्याच्या घरी जाण्यासाठी मंगळवारी दि. २३ मे रोजी दुपारी १२ वाजेनंतर निघाला होता. त्याच्यासोबत अमळनेर येथील प्लॉट व्यवहाराचे दोन लाख रुपये होते. तसेच तिकडून परत येतांना त्याच्या पत्नीलाही तो सोबत घेऊन येणार होता.
जळगाव वरून धरणगाव मार्गे एक्टिव्हा (एमएच १९ डीएच ६८४०) ने निघाल्यावर धरणगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसवे गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकी वरील सहा जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यात तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्याची एक्टिवा गाडी आणि त्याच्या जवळील दोन लाख रुपये घेऊन पसार झाले. काही वेळाने नागरिक आल्यावर त्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन पोलिसांनी माहिती घेतली आहे. धरणगाव ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान घटनेबद्दल एलसीबीचे पथक देखील माहिती घेत असून दरोडेखोरांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.