मान्यवरांची भावना, शहरवासीयांनी वाहिली श्रद्धांजली

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील उद्योजक, गोसेवक, शाकाहार प्रणेते आणि समाजमहर्षी रतनलाल सी. बाफना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात जळगाववासीय रविवारी २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एकत्रित आले होते. गोरगरीब, सामान्य जनतेसाठी ज्यांनी आयुष्य वेचले, भूतदया जागविण्यासाठी पशुसेवा ज्यांनी केली, असे पुण्यवंत, समाज हितैषी व्यक्तिमत्व बाफनाजी यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासासाठी अतुलनीय आणि अविस्मरणीय योगदान दिले, असा सूर या श्रद्धांजली सभेतून व्यक्त्यांनी मांडला.


माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दृकश्राव्य संदेशाद्वारे म्हणाल्या की, माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. वंचित, शोषित, गरीब लोकांचे ते कैवारी होते. सेवाभावी वृत्ती त्यांच्यात होती. माजी मंत्री सुरेशदादा जैन दृकश्राव्य संदेशाद्वारे म्हणाले की, बाफनाजी यांना निश्चितच सुंदर आयुष्य लाभले. सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांनी जळगावचे नावलौकिक केले, अशा भावना व्यक्त केल्या.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, बाफनाजी महान व्यक्तिमत्व होते. त्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांचा आशीर्वादच मिळाला, अशी भावना मांडली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले की, समाजसेवेचा सच्चा माणूस हरपला तर महापौर भारती सोनवणे यांनी, शहराच्या विकासात बाफनाजी यांनी महत्वाचा वाटा उचलला असे सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी बाफनाजींच्या आठवणी उजागर करीत, त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले. त्यांची जागा भरून काढणे कठीण आहे. सुवर्ण पिंपळाचे पान गळाले आहे. बाफना परिवार त्यांच्यानंतरही समाजसेवेत कायम राहील. अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड म्हणाले की, आम्ही ट्रकभरून पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य, गणवेश घेऊन गावोगावी वाटप केले आहे.बाफनाजींनी स्थापन केलेल्या नेत्रपीढीतून अनेक गरजूंना नेत्रदान मिळाले. बाफनाजी यांचे बंधू कस्तुरचंद बाफना यांनी सांगितले की, समर्पित आणि निर्व्यसनी जीवन ते जगले. भेटणाऱ्या व्यक्तींना जर ते मांसाहारी असतील तर, त्यांना शाकाहाराचे महत्व पटवून दिले. जळगाववासीयांचे उपकार बाफना परिवार सदैव लक्षात ठेवेल, असेही ते म्हणाले. माजी प्राचार्य अनिल राव यांनी क्षुधाशांती सेवा केंद्र विषयीच्या आठवणी जागृत केल्या.
माजी आमदार मनीष जैन, रंगकर्मी शंभु पाटील, व्यापारी युसूफ मकरा,ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, डी.डी. बच्छाव, मल्टिमीडिया फीचर्सचे सुशील नवाल, नवजीवन सुपर शॉपचे अनिल कांकरिया, व्यापारी प्रेम कोगटा, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, अभिषेक बाफना, यांनीही श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन प्रा. यजुवेंद्र महाजन यांनी केले.तर आभार सुशील नवाल यांनी मानले.







