जळगाव (प्रतिनिधी) – शहरात घरफोडी करणाऱ्या तीन तरुणांना एलसीबीच्या पथकाने सुरत रेल्वेगेट परिसरात सतत ४८ तास सापळा लावून शिताफीने अटक केली आहे. त्यांनी शिवाजीनगर परिसरातील वाघुळदे नगरातील घरफोडी केल्याचे दिसून आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी उपनिरीक्षक रवींद्रसिंग गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन व अशोक पाटील यांचे पथक दूध फेडरेशन, सुरत रेल्वे गेट या भागात कार्यरत ठेवले. या पथकाने विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (25), पंकज उर्फ गोलु समुद्रे (22) व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (28) सर्व रा.राजमालती नगर, दूध फेडरेशनजवळ अशा तिघांना जेरबंद केले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाघुळदे नगरातील यश संजय ठाकूर यांच्या घरातून एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविल्याची कबुली दिली व जेथे हे साहित्य ठेवले होते तेथून काढून दिले. त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांना 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.







