मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत यावरुन भाजप नेते टीका करताना वारंवार दिसतात. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी ई पास काढला आहे का अशी विचारणा RTI मध्ये केली आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.
कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. कोकण दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ई-पास काढला आहे का, असा प्रश्न त्यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारला होता. हाच धागा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणण्याची संधी साधली.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.