मुंबई (वृत्तसंस्था) – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज (2 मे) मतमोजणीचा दिवस होता. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आले असल्याने मतमोजणी संथगतीने होत होती. अखेर पंढरपूर- मंगळवेढ्यात भाजपचे समाधान आवताडे 3 हजार 716 मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या निवडणुकीची उत्सुकता आता या निकालाने संपली आहे.
पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे नशीब आजमावत होते. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची केली गेली होती. अनेक दिग्गज नेत्यांनी येथे प्रचारसभा मोठमोठ्या घेतलेल्या होत्या.
ऐन कोरोनाच्या उद्रेकामध्ये ही पोटनिवडणूक घेतली गेली होती. अनेक सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या प्रचार सभा आणि निवडणूक प्रचारावर टीकाही करण्यात आली होती. तसेच राज्यसरकारने कलम 144 मधून निवडणूक क्षेत्राला वगळण्यात आल्यामुळे यावर मोठी चर्चा झाली होती. सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. दुपार पासूनच मतमोजणीमध्ये लीड घेतल्यानंतर समाधान अवताडे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.