जळगाव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचा तारणहार, सहकाराला बळकट करणारा तसेच, राज्यात यशस्वी धोरणात्मक निर्णय घेणारा पक्ष म्हणून ओळख असलेला राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून स्वतःच पायउतार होण्याचा निर्णय मंगळवारी शरद पवार यांनी घेतला. त्यांचा निर्णय कार्यकर्त्यांना आवडलेला नसला तरीही त्यातील दूरदृष्टी लक्षात घेता साहेबानी स्वतःपासूनच भाकरी फिरविल्याचे दिसून आले आहे.
अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केलं होतं. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत. ‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पूर्णो अगितोक (पीए) संगमा, तारीक अन्वर आणि शरद पवार या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शरद पवारांनी स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलं होतं. परंतु पुढे दोघेजण पक्षातून बाहेर पडले आणि एकट्या शरद पवारांनी पक्ष पुढे नेला. २०१२ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. एनडीएकडून संगमांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिलं. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला शरद पवारांच्या विरोधानंतर संगमा यांनी २० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
२९ सप्टेंबर २०१८ रोजी तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात किंमत मिळत नसल्याची त्यांनी नाराजी होतीच. परंतु राफेल करारावर पंतप्रधान मोदींना ‘क्लीन चिट’ दिल्याच्या शरद पवार यांच्या विधानानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर जाणं पसंत केलं.