जळगाव (प्रतिनिधी) – पुढील महिन्यात माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात सभा होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षाच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणूनही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. राज्यात भाजप-शिंदे सरकार एकमेकांमधील उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना न्याय द्यावा, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे जळगाव व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी रविवारी जळगावात लगावला.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळात जिल्ह्यात व परिसरात सभा होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीसंदर्भात तयारीच्या दृष्टीने रविवारी ठाकरे गटाच्या ‘शिवगर्जना’ या मेळाव्याचे केमिस्ट भवन येथे आयोजन करण्यात आले होते. मंचावर सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, समाधान महाजन, दीपकसिंग राजपूत, हर्षल माने, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना प्रमुख पियूष गांधी, नीलेश चौधरी आदी उपस्थित होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप २४८ तर शिंदे गट ४० जागा लढवेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर झालेल्या या मेळाव्यात शिंदे सरकारवर टीका झाली. हे मिंधे सरकार असून आता तरी त्यांनी जागे झाले पाहिजे. तुमच्या आपसातील भानगडी बाजूला ठेवा व अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याकडे पहा, असा सल्लाही सावंत यांनी दिला. पुढील काळातील निवडणुकासह विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा व त्या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहनदेखील या वेळी केले.
उद्धव ठाकरे यांच्या जिल्ह्यासह परिसरात सभा होणार असल्याने त्याबाबत माहिती देण्यात आली. या सभांसाठी जोरदार तयारी करायची असून एप्रिल महिन्यात पाचोरा येथे त्यांची सभा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्याचा या वेळी निषेध करण्यात आला. मेळाव्याला दोन्ही लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.