जळगाव (प्रतिनिधी) – पृथ्वीवरील उर्जेचा पुरवठा मर्यादित आहे, तसेच नवीन ऊर्जा पुन्हा निर्माण होण्यासाठी भरपूर वेळ यामुळे ऊर्जा वाचवणे नक्कीच आवश्यक आहे. याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी बुधवार, दि. १७ मे रोजी ऊर्जा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री गौरव वाघुळदे (असिस्टंट इंजिनियर, जळगाव) हे उपस्थित होते. त्यांच्या सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील प्रा. महेश एच पाटील (विद्युत विभाग प्रमुख) तसेच इतर विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करतांना प्रा. महेश पाटील यांनी ऊर्जा संवर्धनाबाबत सांगताना आपल्या भावी पिढ्यांना ऊर्जेचा वापर करायचा असेल तर संवर्धन हे खूप गरजेचे आहे त्यामुळे ऊर्जेची बचत करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे त्यांनी ग्रीन एनर्जी क्लब हा विद्युत विभागामार्फत स्थापन करण्यात येत असून या मार्फत अवेअरनेस प्रोग्राम घेण्यात येतील अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व सांगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आपण ऊर्जेची बचत करू शकतो फक्त त्याकडे प्रत्येकाचे लक्ष असणे गरजेचे आहे असे नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गौरव वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आपण कशाप्रकारे ऊर्जेची बचत करू शकतो याबद्दल विस्तृत माहिती दिली. अपारंपारिक ऊर्जा संसाधनांची बचत करण्यात ऊर्जा संवर्धन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या शिवाय नूतनीकरण न करता येणार्या ऊर्जा स्त्रोतांना पुन्हा निर्माण होण्यासाठी अनेक शतके लागतात. त्यामुळे त्या ऊर्जेची बचत करणं अपरिहार्य असते. त्यासाठी उपाय योजना म्हणून सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सौर ऊर्जा, पवनचक्क्या यासारख्या पर्यायी ऊर्जेच्या स्त्रोताचा वापर करून ऊर्जा निर्माण करणे म्हणूनच घरामध्ये सर्व पॅनल बसवणे आणि ऊर्जेचा वापर कमी करणार्या उपक्रमांचा अवलंब करणे यावर सर्वांनी भर द्यायला हवे असे त्यांनी नमूद केले. तसेच सौर ऊर्जा,विद्युत वाहन तसेच विद्युत ऊर्जा चोरी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तसेच सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन.के. सैनी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अमित म्हसकर यांनी केले.