नवी मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. विद्या बालन लवकरच तिचा नवा चित्रपट ‘शेरनी’च्या माध्यमातून एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा हा नवा लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. अमित मसुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अबंडाँटिया एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाविषयी निर्माते विक्रम मल्होत्रा आणि टी सीरिजचे निर्माते भूषण कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘शेरनी’ या चित्रपटाचे कथानक अत्यंत खिळवून ठेवणारे आहे. या चित्रपटात विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासंदर्भात बोलताना निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले की, ‘२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’ या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव झाला. इतक्या यशानंतर अबंडाँटिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला मनापासून आनंद होतो आहे.
पुढे, आम्ही काम करत असलेल्या ‘शेरनी’ चित्रपटाचे कथानक फार विशेष आणि महत्त्वाचे आहे. विषयाला समर्पकता प्राप्त करून देण्यासाठी अमितची कायमच मार्गदर्शक भूमिका लाभली आहे. व्यंगात्मक टिप्पणी ही त्याची मुख्य शैली आहे. जी सिनेमाला अधिक रोमांचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा चित्रपट म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे’
तसेच चित्रपटाबाबत बोलताना टी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, ‘शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी खूप आनंदी आहे. विक्रम समवेत काम करणे कायमच आनंददायक असते. अबंडाँटिया एंटरटेनमेंट’सोबत आणखी मनोरंजक व हटके कथांवर काम करण्यासाठी मी यापुढेही उत्सुक आहे’.
अभिनेत्री विद्या बालनचा ‘शेरनी’ हा आगामी चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा चित्रपट संपूर्ण जगभरात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासह शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार अन्य मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे कथानक अत्यंत रंजक असून प्रेक्षकांना एका जागी खिळवणारे आहे.