राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील


यांनी केली पोलखोल
जळगाव (प्रतिनिधी) – वॉटरग्रेसकडून पुन्हा मुरुम मातीसह झाडांच्या फाद्या कचरा संकलनाच्या वाहनांमध्ये भरुन वजन वाढविण्याचा प्रकार सुरु झाला असून या सर्व प्रकाराचा भांडाफोड राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला आहे.
जळगाव शहरात दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला होता. परंतु सहा महिन्यातच मक्तेदाराचे काम समाधान कारक नसल्याचा ठपका मक्तेदारावर ठेवण्यात आला होता. तसेच मक्तेदाराचे बिल मनपाने अडविल्यामुळे मक्तेदाराने काम बंद केले होते. त्यामुळे मनपाने काही महिने पर्यायी व्यवस्था केली होती. त्यानंतर कायदेशिर अडचणी येवू नये म्हणून पुन्हा वॉटरग्रेस कंपनीच्या मक्तेदाराला मनपाने एक संधी दिली असून वॉटरग्रेसने पुन्हा शहरात काम सुरु केले. परंतु मक्तेदाराने मागिल कित्ता पुन्हा गिरवायला सुरुवात केली आहे.

मक्तेदाराला संकलित केलेल्या वजनानुसार मनपाकडून पैसे दिले जाणार असल्याने मक्तेदाराकडून पुर्वीप्रमाणेच मुरुम माती, दगड गोटे, झाडांच्या फांद्या कचऱ्याच्या वाहनांमधून वाहुन नेले जात आहे. हीबाब लक्षात आल्यावर शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी कालिंका माता चौकातील वजनकाट्यावर वाहनाची तपासणी केली असता त्यांना वाहनांमध्ये कचरा ऐवजी तोडलेली झुडपे, मुरुम माती भरलेली आढळून आली. यासंदर्भात अभिषेक पाटील यांनी मनपाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना माहिती दिली असता पवन पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. दरम्यान अभिषेक पाटील यांनी वाहने दाखविली कचरा संकलनात मक्तेदाराकडून गैरप्रकार होत असल्याचे सांगितले. यावर पवन पाटील यांनी संपूर्ण चौकशीकरून मक्तेदार दोषी असल्यास दंड आकारला जाणार असल्याचे सांगितले.







