पाटणा (वृत्तसंस्था) – बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत खेर एनडीएऩे काठावरचे बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. मात्र, असे असले तरी सत्तेतीतल एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचा फरक असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आले आहे. एकीकडे तेजस्वी यादव यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार येण्याचा दावा केला असतानाच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले असून, काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मांझीच्या ऑफरमुळे आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे निवडून आलेले आमदार गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बिहार काँग्रेसमध्येही यापूर्वी फूट पडली होती. 2017 मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते काँग्रेस सोडून जेडीयूमध्ये आले होते. सध्या अशोक चौधरी हे जेडीयूचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती बनलेले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 125 जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये भाजपने 74 जेडीयूने 43, हम पक्षाने 4 आणि व्हीआयपी पक्षाने 4 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला 110 जागा मिळाल्या. त्यामध्ये आरजेडीला 75 काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत.








