चाळीसगाव (प्रतिनिधी) – आदिवासी भिल्ल समाजाचे दैवत वीर एकलव्य भगवान जयंतीनिमित्त पिंपळवाढ म्हाळसा येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने वीर एकलव्य भगवान यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली. चौथऱ्यावर स्थापित वीर एकलव्य भगवान यांच्या मूर्तीला आमदार मंगेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सरपंच भाऊसाहेब पाटील, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चाचे दिनेश महाजन, कैलास नाना, माजी सरपंच विजय अहिरे, प्रकाश पाटील, उपसरपंच प्रदीप पाटील, माजी उपसरपंच मुकेश जाधव, अण्णा महाले, माजी पंचायत समिती सदस्य सतीश अहिरे, सुशील पाटील, भाऊसाहेब भिल्ल, संजय माळी, नाना माळी, बालू भिल्ल, ग्रामपंचायत सदस्य दगडू भिल्ल, माजी उपसरपंच विठ्ठल नाईक, भाऊसाहेब भिल्ल, विकास भिल्ल, तामसवाडी येथील अर्जुन दळवी, शाम पाटील, तुषार पाटील, भागवत पाटील, नाना पाटील आदी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मनोगतात सांगितले की, आदिवासी भिल्ल समाज हा पूर्वीपासूनच लढवय्या आणि या मातीशी इमान राखणारा समाज असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. वीर एकलव्य भगवान हे त्याकाळातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर होते. मात्र नियतीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आणि त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्य यांना आपला अंगठा द्यावा लागला. आदिवासी समाजाचे नायक, आद्यक्रांतिकारक तंट्यामामा भिल्ल यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले.
आज काळ बदलत आहे तसे आदिवासी समाजात देखील बदल घडत आहेत. माझी यामाध्यमातून सर्व समाजाला आवाहन आहे की वीर एकलव्य यांची शिकवण मनात ठेवत आहे त्या परिस्थितीचा सामना करत नोकरी, उद्योग, व्यवसाय या क्षेत्रात भिल्ल समाजाच्या तरुणांनी पुढे यावे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या नात्याने आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय न होऊ देता त्यांच्या उन्नतीसाठी शासकीय व व्यक्तिगत पातळीवर जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आमदार चव्हाण यांनी आश्वासन दिले.