जळगाव(प्रतिनिधी) – येथील महत्वाच्या औद्योगीक वसाहत परिसरातील रिद्धी-सिद्धी दालमिलच्या कंपाऊंडचे शटर वाकवुन अज्ञात चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयाचे ९८ डाळीचे पोते लंपास केल्याची घटना घडली.
अयोध्यानगर येथील रहिवासी प्रकाश शांतीलाल जोशी (वय-४७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची औद्योगीक वसाहत व्ही सेक्टर मध्ये रिद्धी सिद्धी डाळमिल आहे. दर शनिवारी डाळमिल मध्ये शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची मोजणी करुन छाटणी होते. १७ ऑक्टोबर रोजी सर्व मालाची मोजणी करण्यात आली होती. प्रकाश जोशी ३१ ऑक्टोबरला बाहेरगावी गेल्याने डाळमिलमध्ये ७ कामगार नेहमी प्रमाणे कार्यरत होते. शनिवार ७ नोहेंबर रोजी फिर्यादी जोशी परत आल्यावर त्यांनी कंपनीत येणाऱ्या व जाणाऱ्या मालाची माहिती घेतली. प्रकाश जोशी व त्याचा मित्र योगेश पाटील माल मोजत असतांना त्यांना शटरला लागून असलेला पत्रा वाकवलेल्या स्थितीत आढळून आला. सर्व कामगारांना बोलावून डाळीचे पोते मोजुन घेतल्यावर तब्बल ९८ पोती हरभरा डाळ कमी भरली. अज्ञात चोरट्यांनी दालमिलच्या शटर शेजारील पत्रा वाकवुन चोरी केल्याचे आढळून आल्याने प्रकाश जोशी यांनी एमआयडीसी पेालिसांत धाव घेतली. चोरट्यांनी २ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे ९८ पोते डाळ चोरीला गेल्याप्रकरणी जोशी यांनी तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.