जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव पुन्हा एकदा भाग्यवान ठरले आहे. मागील वेळी जळगावच्या भोकर येथील सभेत आले असताना त्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाद्वारे “धनुष्यबाण” चिन्ह व नाव मिळाले होते. आता मुख्यमंत्री शिंदे १० मे रोजी विवाह सोहळ्यानिमित्त जळगावी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे शिंदेंना जळगाव पुन्हा एकदा भाग्यवान ठरल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी १७ रोजी निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं होते. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला होता. जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार आणि अपक्ष आमदार हे शिंदे यांच्याकडे आहेत. त्यात गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे चोपडा मतदारसंघाचे आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांची कन्या अमृता हिचा विवाह होता. अमृताच्या विवाहाप्रित्यर्थ बुधवारी १० मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दिली होती. आज ११ मे रोजी राज्यातील सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टात निकाल होता.
हा निकाल देखील एकनाथ शिंदेंच्या बाजूने गेला आहे. काही ठळक बाबी विशद करीत शिंदेंच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जळगाव पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना भाग्यवान ठरले असल्याची चर्चा जळगावात रंगली आहे. ज्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरु होती, त्यात जळगावचे पारोळा – एरंडोल मतदारसंघचे चिमणराव पाटील आणि वधू माता खुद्द लताताई सोनवणे ह्या देखील होत्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच निकाल शिंदे गटाला चांगलाच भावला असल्याची प्रतिक्रिया जळगावात उमटल्या आहे.