धरणगाव (प्रतिनिधी) :- पंचायत समिती धरणगाव येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३२) आणि सागर कोळी (खाजगी इसम) यांनी परकुलचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या माहितीनुसार तक्रारदारास वर्ष २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत परकुल मंजूर झाला होता. पहिला हप्ता रु. १५,०००/- त्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांनी संबंधित कामही पूर्ण केले होते. परंतु दुसरा हप्ता न मिळाल्याने तक्रारदार पंचायत समितीत चौकशीसाठी गेले असता अभियंता गणेश पाटील यांनी “निधी उपलब्ध नाही” असे सांगितले.
नंतर गावातील नागरिकांकडून दुसरा हप्ता मंजूर झाल्याची माहिती मिळाल्याने तक्रारदार ८ जुलै २०२५ रोजी पुन्हा पंचायत समितीत गेले. तेव्हा अभियंता गणेश पाटील यांनी दुसरा हप्ता जमा करण्यासाठी १०,००० रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान अभियंता पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सागर कोळी यांच्यामार्फत ही रक्कम स्वीकारली जाईल, अशीही आरोपीने फोनवर कबुली दिली होती.
त्या आधारे धरणगाव पोलीस स्टेशनला गु.नं. ३९१/२०२५, प्रकरण ७ प्र.कायदा कलम १२ प्रमाणे दि. ०४/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर ,निरीक्षक हेमंत नागरे ,पो.ना. बाळू मराठे,, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी कारवाई केली.









