जिल्हा परिषदेत भावपूर्ण सोहळा, कर्मचारी भावविभोर
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षात केलेल्या लोकप्रिय कामांमुळे तसेच, शिस्तबद्ध, कर्मचाऱ्यांप्रती आपुलकी या गुणांमुळे प्रसिद्ध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नुकतीच यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. त्यानिमित्त शनिवारी २९ रोजी जिल्हा परिषदेत त्यांना सपत्नीक भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या पायवाटा फुलांनी सजलेल्या होत्या.
जळगाव जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासोबतच शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. आशिया यांनी प्रयत्न केला. जळगातील कार्यकाळ आयुष्यभर स्मरणात राहील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्याचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी व्यक्त केला.
छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित निरोप समारंभाच्या वेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. आशिया बोलत होते. यावेळी डॉ. आशिया म्हणाले की, जिल्हा परिषदेचे स्थानिक पदाधिकारी तसेच राजकीय पदाधिकारी यांनी देखील मला समजून घेतले. मी पदभार घेतला तेव्हा जळगाव जिल्हा परिषदेत फार प्रतिकूल परिस्थिती होती. मात्र असे असताना देखील विभागवार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत सर्वच विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय दृष्ट्या आणि वैयक्तिक दृष्ट्या देखील जळगाव माझ्या कायम स्मरणात राहील. माणसाने माणसाशी माणसासारखे वागले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतात. जळगाव ने मला खूप काही दिले आहे, असे सांगून ऋणनिर्देश देखील केले.
शनिवारी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे प्रभावी मुख्याधिकारी आर. एस. लोखंडे हे होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्या लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, शिक्षणाधिकारी विकास पाटील, महिला व बाल विकास विभागाचे राऊत, यांचे सह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ.आशिया यांचा सपत्नीक शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षण अधिकारी विकास पाटील म्हणाले की जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला गतिमान व पारदर्शक करण्याचे काम आशिया यांच्या काळात झाले आहे. जिल्हा परिषदेतील अनेक प्रलंबित विषय त्यांनी मार्गी लावले. गोरगरीब जनतेच्या मुलांना गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न राहिला असेही त्यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा बांगर म्हणाल्या की, डॉ. आशिया यांच्या चेहऱ्यावर कधीही हास्य दिसले नसले तरी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी मनोगत सांगितले की, डॉ. आशिया यांच्या कार्यकाळात सर्वच कामे प्राधान्याची होती. त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत एकही काम अपूर्ण ठेवलेले नाही. त्यांच्याच कार्यकाळात ३८० अनुकंप धारक तरुणांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. कुटुंबांना उभे करण्याचे काम डॉक्टर आशिया यांनी केले असल्याचेही त्या म्हणाल्या.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे यांनी सांगितले की, मला मिळणाऱ्या पगारात माझे भागते हे सांगणारे डॉक्टर आशिया यांच्यासारखे अधिकारी आम्हाला लाभले आमचे भाग्य आहे. आशिया यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळाली आहे व ती यापुढे देखील मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी आपल्या मनोगत सांगितले की, कर्मचाऱ्यांचे हित जोपासणारा आणि विकासात्मक दृष्टी असलेला पहिला अधिकारी बघितला आहे. असेही ते म्हणाले. डॉ पंकज आशिया यांना निरोप देताना कर्मचारी अधिकारी भावुक झालेले दिसून आले. मनोगत व्यक्त करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, शिक्षणाधिकारी विकास पाटील डॉ. बांगर यांचे डोळे पणावले होते. निरोप समारंभाचा कार्यक्रम आटोपून डॉ.आशिया बाहेर पडत असताना त्यांच्यावर सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आशिया हे देखील भाऊक झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बोंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत चौधरी, भूषण तायडे, राजू सोनवणे यांनी परिश्रम घेतले.