यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना, १५ दिवसांपासून सुरू होते उपचार
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दि. ३ मे रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवार दि. १७ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
राजेंद्र धुडकू पाटील (वय ५३, रा. आत्माराम नगर, किनगाव, ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. किनगावात ते पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन भावांसह राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी विविध सोसायटीचे व इतर कर्ज घेतले होते. हे कर्जफेड करता न आल्याची त्यांना खंत होती. याच विवांचनेतून त्यांनी दि. ३ मे रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
कुटुंबीयांनी त्यांना जळगावला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान प्रकृती खालावत असल्याने रविवारी दि १२ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवार दि. १७ मे रोजी त्यांचा सकाळी १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनी आक्रोश केला असून किनगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम करण्यात आले आहे.