जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील विठ्ठलपेठ येथील प्रौढाने तालुक्यातील कुसुंबा शिवारात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी बहिणीला फोन करून, मी येणार नाही, घरी लक्ष ठेव असे कळविले होते.
हिरालाल नारायण चौधरी (वय ५२, रा. विठ्ठलपेठ, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. कंपनीमध्ये कामाला असलेले हिरालाल चौधरी हे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह विठ्ठलपेठेत राहत होते. ते दि. १४ मेपासून घरून निघून गेलेले होते. दि. १५ मे रोजी त्यांनी त्यांच्या बहिणीशी संपर्क साधून मी येणार नाही, घरी लक्ष ठेव असे कळविले होते. त्यानंतर १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात ते गळफास घेतलेल्या अवस्थेत एका जणाला दिसले. या विषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. इसमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.