धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई
धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीज तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अत्यंत धाडसी कारवाई करत पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपींचा पाठलाग करून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे चोरीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला आहे.

धरणगाव पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वीज तारा चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथक रवाना करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून अजय बापू गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात २ विधीसंघर्षित बालकांसह एकूण ९ जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
इलेक्ट्रिक पोलवरून चोरी केलेली ४.५० लाख रुपये किमतीची तार, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप (क्र. एमएच ०४ जीएफ ४८७२), किंमत ६ लाख रुपये, एकूण १० लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींनी केवळ धरणगावच नव्हे, तर चोपडा आणि अडावद परिसरातही वीज तारांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. यामुळे या भागातील चोरीच्या अनेक घटनांची उकल होण्याची शक्यता आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंदराव घोलप आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. सपोनि प्रशांत कंडारे, हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे, संघपाल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.









