कौतुकास्पद उपक्रम : जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपाची परंपरा कायम…
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्याची ओढ लागलेली आहे परंतु जिल्हा परिषद शाळेतूनच शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचलेल्या व्यक्ती गेलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया जिल्हा परिषदेच्या शाळा मधूनच रचला जातो. त्यामुळे मराठी जिल्हा परिषदेचे शाळा टिकल्या पाहिजेत. कारण आजच्या विज्ञान युगात विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथील शोभा हॉस्पिटलचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी केले. रावेर तालुक्यातील वाघाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असताना डॉ.पाटील बोलत होते. याप्रसंगी मुक्ताईनगर येथील शोभा हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. उज्वला पाटील , मुक्ताई पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शरद बोदडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय सापधरे, रावेर पंचायत समिती सदस्य दिपक पाटील , ग्रामसेवक एच डी शिरसाट, स्वप्निल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी रावेर तालुक्यातील वाघाडी येथील दामोदर महाजन , बाळू पाटील , शालिक महाजन ,महेंद्र पाटील , विठ्ठल महाजन , सुभाष महाजन , सचिन पाटील , निवृत्ती पाटील , प्रकाश महाजन , माजी सरपंच अशोक कोळी , रामदास कोळी , बाळू कोळी , सदाशिव ओंकार पाटील , अंगणवाडी शिक्षिका दिक्षा इंगळे , ग्रामपंचायत सदस्य कुंदन चौधरी ,जगदीश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले वाघाडी गाव चे सुपुत्र जगदीश पाटील यांचा हि सार्वजनिक सत्कार करण्यात आला. वाघाडी येथील स्वर्गीय लोटू सांडू पाटील गुरुजी आणि स्वर्गीय जयवंताबाई लोटू पाटील व स्वर्गीय सुमित्राबाई संतोषराव पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या 2009 पासून म्हणजे तब्बल 22 वर्षांपासून दरवर्षी वाघाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तर , वह्या , पुस्तके , पेन, पेन्सिल कंपास, पिण्याच्या पाण्याची बाटली अशा शालेय साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम गेल्या 22 वर्षांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ व शिक्षण प्रेमीकडून आयोजकांचे कौतुक केले जात आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागांमध्ये टिकवणे महत्त्वाचे असून विद्यार्थी संख्या कमी होत आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या अस्तित्व धोक्यात आले आहे.परंतु राज्यघटनेने दिलेला मोफत शिक्षणाचा अधिकार जिल्हा परिषद शाळा राबवत असून त्यामुळे देशाचे भविष्य असलेल्या गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. करिता जिल्हा परिषद शाळा टिकविणे आवश्यक आहे , असे याप्रसंगी आयोजक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.तसेच ग्रामस्थांनीही मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक पाटील यांनी केले. त्यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद बोदडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक गिरीश पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सोनल महाजन यांनी मानले.