जळगाव तालुक्यात झाला होता अपघात, गोराडखेडा गावावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा ते वडलीदरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी घरी परतत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
निशांत विजय पाटील (राजपूत, वय १९, रा. गोराडखेडा ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई. वडील, १ बहीण असा परिवार आहे. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता.(केसीएन) तर वडील विजय पाटील हे गोराडखेडा गावचे उपसरपंच आहेत. दरम्यान, शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी निशांत हा महाविद्यालयातून घराकडे संध्याकाळी ७ वाजता दुचाकीने निघाला होता. सुमारे ८ वाजता तो वावडदा ते वडलीदरम्यान आला असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.
अपघातात निशांतच्या डोक्याला जबर मार लागलेला असल्याने नातेवाईकांनी त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, निशांतवर उपचार सुरु असताना सोमवारी दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.(केसीएन)पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. तर तरुण मुलाच्या मृत्यूमुळे गोराडखेडा गावावर शोककळा पसरली आहे.