जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नॅक पूनर्मूल्यांकनासाठी समिती भेटीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात आज शनिवार, दि.२१ ऑगस्ट रोजी कचरा मुक्त् व प्लॅस्टीक मुक्त् परिसर अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे या अभियानात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
विद्यापीठास दि.२३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत चौथ्या पूनर्मूल्यांकन साखळीसाठी बंगळूरु येथील नॅक संस्थेव्दारा नियुक्त् समिती भेट देणार आहे. ही समिती विद्यापीठातील प्रशाळा व विविध इमारती आदी स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवार दि.२१ ऑगस्ट रोजी दुपार सत्रात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यापीठ परिसर कचरा मुक्त् व प्लॅस्टीक मुक्त् करण्यासाठी अभियान राबविले. या अभियानात विद्यापीठ परिसरातील गांधी टेकडी, स्टेडीयम परिसर ते मुख्य रस्ता, मुलींचे सर्व वसतिगृह आवार, मुलांचे सर्व वसतिगृह परिसर, शिक्षक भवन, विविध प्रशाळा, मुख्य प्रशासकीय इमारतीचा परीसर तसेच मुख्य रस्त्याचा परिसर या ठिकाणातील कचरा व प्लॅस्टीक जमा करण्यात आले. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, डॉ. प्रिती अग्रवाल, दीपक पाटील यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. या अभियानात ३०० पेक्षा अधिक कर्मचारी, दैनिक वेतनिक, कंत्राटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.