मुंबई (प्रतिनिधी) – येथील विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत विधानसभेचे कामकाज चार दिवस बंद राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार दि. २९ ते मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाज होणार नाही.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज २८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत केली. सदरहू बैठकीत समितीने विचार विनिमय करून सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे असा निर्णय घेतलेला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, उद्या शुक्रवारी ता. २८ जुलैला नेहमीप्रमाणे शासकीय व अशासकीय कामकाज होईल. त्यानंतर शनिवार ता. २९ जुलै व रविवार ता. ३० जुलै शासकीय सुट्टी आहे. तर सोमवारी ता. ३१ जुलै आणि मंगळवारी ता. ०१ ऑगस्ट सभागृहाची बैठक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या मतदारांपर्यंत आमदारांना मदत पोहचवता यावी यासाठी सोमवार आणि मंगळवारी कामकाजाला सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
त्याशिवाय १ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने देखील सभागृहाची बैठक होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर बुधवार ता. २ ऑगस्ट, गुरुवार ता. ३ ऑगस्ट रोजी शासकीय कामकाज आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. शुक्रवारी ता. ४ ऑगस्ट शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाज पार पडेल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रसाद लाड, एकनाथ खडसे, अनिल परब, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, कपिल पाटील, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव पुष्पा दळवी आदी उपस्थित होते.