वृक्ष लागवड योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३६ हजारांची लाच !
जळगाव (प्रतिनिधी) :- अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागाच्या ३ कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. यात वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे, लिपिक निलेश मोतीलाल चांदणे आणि कंत्राटी चालक कैलास भरत पाटील यांचा समावेश आहे. तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार शेतकरी आणि त्यांच्या तीन नातेवाईकांना त्यांच्या शेतात बांबू लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी अमृत महोत्सवी योजनेअंतर्गत चार अर्ज सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांच्याकडे दाखल केले होते.(केसीएन)या विभागाचा अतिरिक्त कार्यभार पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे यांच्याकडे असल्याने, तक्रारदार २५ जुलै रोजी त्यांना भेटले. यावेळी कापुरे यांनी प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी १० हजार अशा एकूण ४० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार शेतकरी यांनी ५ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची शहानिशा केली असता, वनअधिकारी मनोज कापुरे आणि लिपिक निलेश चांदणे यांनी तडजोडीअंती ३६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यातील ३५ हजार रुपये स्वतःसाठी आणि १ हजार रुपये लिपिक चांदणे यांच्यासाठी मागितल्याचे समोर आले. तसेच, ही रक्कम कैलास भरत पाटील (कंत्राटी चालक) याच्याकडे देण्यास सांगितले.(केसीएन)ठरलेल्या ठिकाणी पंचांसमक्ष कंत्राटी चालक कैलास पाटील याने ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहात पकडले. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे वन विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदरची कामगिरी पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह पथकाने केली आहे.