मुंबई (वृत्तसंस्था ) ;- हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले.







