मुलाला भेटून पुण्याहून परतताना घडली भीषण घटना, जळगावात शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : पुणे येथून जळगावकडे परतणाऱ्या कारला भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने ५८ वर्षीय महिला जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती व वाहन चालक हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिताली सुभाष पाटील (वय ५८, रा. विनोबा नगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सुभाष राजाराम पाटील (वय ६०) व चालक योगेश बारी (वय ३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले आहेत. निवृत्त कृषी अधिकारी सुभाष पाटील व मिताली पाटील हे चालक योगेश बारी याच्यासह कार क्रमांक (एमएच ०३, एडब्ल्यू २६६१)ने पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते सोमवारी १५ सप्टेंबर रोजी जळगाव येथे घरी परत येत होते. रात्री ८ वाजता अजिंठा घाट उतरल्यानंतर टी पॉईंटनजीक मागून येणाऱ्या ट्रेलर (एमएच २१, बीवाय ४९१६) वरील चालकाचे नियंत्रण सुटले व ते थेट कारवर येऊन धडकले. कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रेलरखालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला. तर सुभाष पाटील व योगेश बारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.