पोलीस दलाने धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात
जळगाव (प्रतिनिधी) : प्रेम विवाहाच्या वादातून रविवारी पिंप्राळ्यात तरूणाचा खून झाल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी पडसाद उमटले आहेत. संशयित आरोपींच्या घरांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे मुकेश रमेश शिरसाठ या तरुणाचा रविवारी कोयता मारून निर्घृण खून करण्यात आला होता. प्रकरणामध्ये आता काही जणांनी सोमवारी दि. २० जानेवारी रोजी संशयित आरोपींचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सकाळी १० वाजता पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रोश करत हल्लेखोरांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ७ संशयित आरोपींना अटक केली आहे.
या परिसरात जाळपोळ होत असल्याची माहिती मिळाल्याने विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा मयत मुकेश शिरसाठ यांच्या पत्नी, आई आणि बहीण यांनी दिला आहे.