आ. राजूमामा भोळे यांची “दिशा समिती”च्या बैठकीत मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : तरसोद ते पाळधी या बायपास रस्त्याचे काम प्रलंबित आहे. हे काम संथगतीने सुरु असून कामाला गती देऊन लवकरात लवकर रस्ता सुरु झाला पाहिजे अशी मागणी शहराचे आ. सुरेश भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘दिशा ‘ (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) च्या बैठकीत केली.
प्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षाताई खडसे, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.(केपीएन) यावेळी आ. भोळे म्हणाले की, आकाशवाणी चौक ते अजिंठा चौक येथे दररोज वाहतूक जाम होते. ट्रॅफिकचा प्रश्न सुटला पाहिजे. तसेच महामार्गावरील खड्डे बुजले गेले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे पैसे वेळेवर मिळावे, सिटी सर्व्हेतील नागरिकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, महावितरणच्या नवीन सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सुटला पाहिजे असे विविध विषयदेखील आ. भोळे यांनी मांडले.(केपीएन)तर महानगरपालिकेचे विविध विषय प्रलंबित आहेत. समस्या आहेत. त्याविषयी सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेत खा. स्मिता वाघ यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.