भिक्षु असो व गृहस्थ श्रावक, तो सुव्रती असेल तरच दिव्यगतीस प्राप्त होऊ शकतो. अनगार (भिक्षु) आणि श्रावक (गृहस्थ) यांनी विवेकपूर्ण व्रत आचरण करावे. भगवान महावीर यांच्या काळात देखील दहा श्रावक प्रसिद्ध होते, त्यांचे वैशिष्ट्ये सांगत उत्तम श्रावकाची लक्षणे काय असतात याबाबत प.पू. सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून प्रबोधन केले.
आजच्या युगातील श्रावक व पूर्वीच्या श्रावकांमध्ये फरक जाणवतो. पूर्वीचे श्रावक आधारस्तंभा सारखे होते परंतु आजचे आहेत का? याबाबत चिंतन व्हायला हवे. या ठिकाणी गुणधर गौतम स्वामी आणि आनंद श्रावक यांच्यातील संवाद आजही मार्गदर्शक ठरतो. यावेळी ५ अभिगम सांगितले त्यात, सचित्त का त्याग, अचित्त का विवेक, उत्तरासंग धारण, अंजलिकरण आणि मन की एकाग्रता याबाबतचे मार्गदर्शन परमपूज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी उपस्थितांना केले.
परमपुज्य भूतीप्रज्ञ म.सा. यांनी उत्तम तप याबाबतचे विवेचन केले. तपा शिवाय मुक्ती नसते. तप करणे व तप करणाऱ्याला अनुमोदन करणे हे तर पुण्यार्जनाचे कारण होय. तपाची महती सांगताना राजा व त्याचे गुरू असलेल्या साधुंची गोष्ट सांगितली. आपल्या गुरुंना व त्यांच्या समवेत असणाऱ्या साधुंना आजारात त्वरेने उपचार मिळावे म्हणून औषधींसह एका वैद्याला सोबत पाठविले. दोन वर्षे झाले तरी गुरू किंवा त्यांच्या समवेत असलेल्या ५०० साधुंना आजार आला नाही. वैद्य आश्चर्य करत साधु गुरुंना म्हणाले एका रोगावर अनेक औषधी माझ्याकडे आहेत पण त्यावर साधु म्हणतात माझ्याकडे अनेक रोगांचे एकच औषध आहे ते म्हणजे ‘तप’ इतके तपस्येचे महत्त्व असते. तुम्ही आम्ही तपस्या करून कर्म निर्जरा करण्यासाठी सांगितलेल्या सम्यक ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप या चार मार्गांचा अवलंब करावा.