चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) :- हैदराबाद येथून बऱ्हाणपूर येथे हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडील मुद्देमाल एका महिलांच्या टोळीने चोरुन नेला, चोरी केल्यानंतर ही टोळी हुशारीने रेल्वे बदलून दुसऱ्या रेल्वेने प्रवास करीत असतांना जळगावात लोहमार्ग व आरपीएफच्या पथकाने त्या टोळीला रविवार दि. २ रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कन्हैयालाल रतीलाल सुगंधी (वय ५०, रा. हैदराबाद) या प्रवाशाची सुटकेस त्यांनी चोरली होती. कन्हैयालाल सुगंधी हे कुटुंबासह हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने बऱ्हाणपूर येथे जात होते. प्रवासात ते झोपलेले असताना नगरसोल ते मनमाड स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये रोख ७ हजार रुपयांसह सोन्याचे दागिने व कपडे असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता. (केसीएन)या विषयी त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. या घटनेचा तपास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे प्रफुल्ल खर्चे, गजानन पाटील, महेंद्र कुशवाह, शबाना तडवी, मनीष सिंग तसेच जळगाव लोहमार्गचे पोहेकॉ सचिन भावसार, रवी पाटील, सतीश पाटील, राहुल गवळी यांना दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये चार महिला संशयितरित्या आढळून आल्या.
पोलिसांनी या महिलांची चौकशी करीत निशा अशोक बेर्डे (वय ३९), राहया शिंदे (वय २०), पूनम संदीप बर्डे (वय २२), गोधाबाई सतीश बर्डे (वय २०, सर्व रा. येरमाला वस्ती, पारधी फाटा, धाराशिव (उस्मानाबाद)) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या महिलांकडे चोरीला गेलेली सुटकेस आढळली. पथकाने ती ताब्यात घेत चारही महिलांना अटक करून मनमाडच्या पथकाकडे त्यांना सोपविले. हैदराबाद-हिसार एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर या महिला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरल्या. तेथून त्या दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये बसून प्रवास करीत होत्या. त्याचवेळी चोरीचा संदेश मिळाल्याने याच रेल्वेत रेल्वे सुरक्षा बलाच्या वरील पथकाने त्यांना हेरले. या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले आहे.