नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) सुप्रीम कोर्टाने मुलींच्या अधिकारात आणखी वाढ केली आहे. वडिलांचा विना मृत्यूपत्र मृत्यू झाला तरी मुलींना चुलत भावांपेक्षा जास्त मालमत्ता मिळेल, असे म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. खंडपीठाने म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू इच्छापत्राशिवाय झाला, तर त्याच्या मृत्यूनंतर मालमत्ता, त्याने स्वत: तयार केलेली असो किंवा वडिलोपार्जित, दोन्ही प्रकरणांमध्ये कायदेशीर वारसांमध्ये विभागली जाईल.
न्यायालयाने असे मानले की अशा पुरुष हिंदूच्या मुलीला तिच्या इतर नातेवाईक जसे की मृत वडिलांच्या भावांची मुले किंवा मुलींना प्राधान्य देऊन मालमत्तेचा वारसा मिळण्यास पात्र असेल. म्हणजेच हा निर्णय संयुक्त कुटुंबातही लागू होणार आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 पूर्वीच्या प्रकरणांमध्येही ही व्यवस्था लागू होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण तामिळनाडूतून आले. हे प्रकरण प्रथम मद्रास उच्च न्यायालयात गेले. तेथे भावाच्या मुलांना मालमत्तेवर अधिकार देण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आल्यानंतर त्यांनी हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. यासोबतच त्यांच्या 51 पानी आदेशात वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा हक्क भावांपेक्षा अधिक असेल, असेही म्हटले आहे.
न्यायमूर्ती कृष्णा मुरारी म्हणाले की, जुन्या ग्रंथांमध्येही महिलांना समान वारस मानले गेले आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात पत्नी, मुलगी अशा महिला वारसांना मान्यता देण्यात आली आहे. 1956 हिंदू उत्तराधिकार कायदा लागू झाल्यापासून मुलींना त्यांचे वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या मालमत्तेत मुलांप्रमाणे समान हक्क असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.