आकाशच्या अकाली जाण्याने कुटुंबियांचे ‘आकाश फाटले ‘ ; परिसरात हळहळ

पहूर ( प्रतिनिधी ) ;– व्हाट्सअप वर ‘भावपूर्ण श्रद्धांजली ‘असे स्टेटस ठेवून जामनेर तालुक्यातील पहूर येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना काल सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली . आकाश रवींद्र बावस्कर (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे .
आकाशने राहत्या घरात छताला गळफास लावून जीवनयात्रा संपविली .गळफास घेण्यापूर्वी त्याने दुपारी ४.३७ मिनिटांनी ‘ भावपूर्ण श्रद्धांजली ‘ असे स्टेटस ठेवले आणि काही मिनिटातच त्याने घराच्या वरील मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये छताला गळफास लावून स्वतःची जीवन यात्रा संपवली .
घरातील व्यक्तींनी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहताच हंबरडा फोडून आक्रोश करीत आजूबाजूच्यांना बोलावून त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला .
मयत आकाश १२ वी नंतर पोलीस भरतीची तयारी करत होता . आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांसाठी आकाशात फाटले .त्याचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला . मित्र परिवारामध्ये तो एक मनमिळावू स्वभावाचा मित्र म्हणून चांगलाच परिचित होता .परंतु त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र समजू शकले नाही .त्याच्या पश्चात आई-वडील तीन बहिणी असा परिवार आहे .त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
पहुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची परवानगी असलेले वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदनासाठी आकाशचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला ..घटनेची माहिती मिळताच सरपंचपती शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव ,माजी सरपंच लक्ष्मण गोरे , ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर यांच्यासह गावातील पदाधिकारी , ग्रामस्थांसह नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली .







