चाळीसगाव-कन्नड सीमेवर गौताळा अभयारण्यातील घटना तपासात उघड
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील प्रसिद्ध गौताळा अभयारण्यात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या मुंडके नसलेल्या अर्धनग्न मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. एका मित्रानेच आपल्या जिवलग मित्राची क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्याचा खून करायचा होता तो वाचून त्यानेच हल्लेखोर मित्राला कुऱ्हाडीने मुंडके छाटून संपविल्याचे समोर आले आहे.
जळगाव- छत्रपती संभाजीनगर सीमेवर हि घटना घडली आहे. हद्द कन्नड ग्रामीण पोलिसांची आहे. दि. ३ सप्टेंबर रोजी कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौताळा अभयारण्यामध्ये, सनसेट पॉइंटजवळ घनदाट जंगलात पोलिसांना एक धड नसलेला मृतदेह आढळला. काही अंतरावर मृताची कवटी देखील मिळाली. पोलिसांनी सापडलेल्या कवटीवरील “जॉ फॅक्चर क्लिप” वरून तपास सुरू केला.(केसीएन)या क्लिपच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह निखिल हिरामण सूर्यवंशी (रा. शिंदी, ता. चाळीसगाव) या तरुणाचा होता. तब्बल ३८ रुग्णालयांत तपास केल्यावर जुलै २०२३ मध्ये घोटीच्या एसएमबीटी रुग्णालयात निखिलच्या जबड्याचे ऑपरेशन झाले होते, हे निष्पन्न झालं.
ओळख पटल्यानंतर पोलिसांनी निखिलच्या सर्व मित्रांची चौकशी केली. सर्व मित्र चौकशीसाठी समोर आले, पण त्याचा जवळचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर मात्र पोलिसांपासून दूर पळत होता. पोलिसांना श्रावणवर संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. खाक्या दाखवताच त्याने निखिलच्या खुनाची कबुली दिली. श्रावणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी निखिल सूर्यवंशी याने श्रावणाला भेटायला बोलावले. सायगाव मार्गे ते दोघे दुचाकीवरून सनसेट पॉइंटकडे गेले.(केसीएन)तिथे गेल्यानंतर निखिलने अचानक श्रावणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निखिल म्हणाला, “माझे सर्व गैरकृत्य आणि व्यसन तुला माहीत आहे. त्यामुळे माझी बदनामी होत आहे आणि माझे लग्न देखील ठरत नाहीये. म्हणून आज तुझा जीव घ्यायचा आहे.” असे म्हणत त्याने कुऱ्हाडीने श्रावणवर वार केला. मात्र, श्रावणने तो वार चुकवला आणि निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली. निखिल खाली पडताच, त्याच कुऱ्हाडीने श्रावणने त्याचे शीर धडापासून वेगळे केले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पाच पथके तयार करुन तपास सुरू केला. उपअधीक्षक डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, अंमलदार प्रमोद पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके एपीआय पवार, पीएसआय जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मोतींगे , बाबासाहेब धनुरे, प्रदीप पवार, सुशील कुमार बागुल, धीरज चव्हाण, शिवदास बोराडे, हर्षवर्धन काळे, दिलवर सिंग वसावे, संदीप कनकुटे या पथकाने खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.