जुने जळगावात श्रीमद्भागवत कथा, कीर्तनाला प्रारंभ
जळगाव (प्रतिनिधी) :- भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग या चार गोष्टी आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत श्रीमद भागवत कळत नाही. भगवंत हा कसा आहे ? तर सच्चिदानंद स्वरूप आहे. विश्व उत्पत्ति करणारा, त्याचं पालन करणारा, पोषण करणारा असा हा भगवंत आहे. भगवंताचे रोजचे स्मरण आपल्याला दिवसभर प्रेरणा देत राहते, असे प्रतिपादन बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी केले.
येथील जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळ आणि जय हनुमान सांस्कृतिक मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन दि. १५ ते २२ जानेवारी दरम्यान जुने जळगाव येथील बदाम गल्ली येथे करण्यात आले आहे. याशिवाय रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करणार आहेत. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली. संध्याकाळी साडेपाच वाजता हरिपाठ घेण्यात आला. बुधवारी दि. १५ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी बीड जिल्ह्यातील श्रीमठ महादुर्ग किल्ले धारूर ता. धारूर येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ केला.
भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामी यांनी पहिल्याच दिवशी राजा परीक्षित यांची कथा सांगितली. पहिल्या दिवशी ऋषी शृंग, भगवान विष्णूंचा अवतार आणि राजा परीक्षित यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. रात्री ८ वाजता संगमनेर येथील हभप योगेश महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सदर श्रीमदभागवत कथा आणि कीर्तन हे युट्यूबवर लाईव्ह (https://youtube.com/live/TswLFLM7LdA?feature=share) दाखविण्यात येत आहे. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळ आणि जय हनुमान सांस्कृतिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.