जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे एका शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीचे शेतात केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यानंतर अचानक वीज आल्यावर शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
शेतकरी बळवंत महारु पाटील यांनी “केसरीराज” ला माहिती दिली आहे. रविवारी दि. १७ मार्च रोजी दुपारी गावात केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे वीज बंद होती. हे काम संपल्यानंतर दुपारी ३ वाजता अचानक वीज आली. त्यानंतर बळवंत पाटील यांच्या शेतात शॉर्टसर्किट होऊन पिकांना आग लागली. यात शेतकऱ्याचे दादर, हरभरा यासह चारा जळून खाक झाला आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटना पाहताच ते धावत आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर बळवंत पाटील यांनी उभे पीक जळालेले पाहून आक्रोश केला.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असून शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.