जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांना शेतरस्ता दुरुस्तीसाठी गौण खनिज व घर बांधकामासाठी रेती पूर्वीच्या परमिट पद्धतीने द्या अशी मागणी शेतकरी कृती समितीने महसूलमंत्र्यांकडे केली आहे
शेतकरी अस्मानी संकटाने आधीच मारला गेलेला असताना शासनाच्या काही चुकीच्या निर्णयाने त्याचे जगणे अजून कठीण झाले आहे. शेतातील रस्ता ना सरकार बनवत ना त्याला स्वतः दुरुस्तीसाठी मुरूम मिळू देत ,ना शेतात घर बांधण्यासाठी रेती मिळत
बाजारात शेतमाल न्यायचा तर सारे रस्ते खराब व शेतातून शेतमाल घरात आणायचा तर रस्त्यांची अवस्था भयानक असे हे दुष्टचक्र आहे
या आधी हे रस्ते शेतकरी जवळच्या नाल्यातील रेती(ग्रव्हल) असो की सरकारी खदानीतून मुरूम आणून दुरुस्त करायचे आता सरकार ते ही करू देणार नसेल तर शेतरस्ते दुरुस्त होतील कसे? , असा प्रश्न कृती समितीने या निवेदनात विचारला आहे
आधी शेतकऱ्यांना घर दुरुस्तीसाठी , शेतातील घर बांधकामाला गौण खनिजाचे परमिट काढून चलन भरून मिळायचे आता रेतीचे टेंडर सुरू झाले त्यामुळे सामान्य माणूस घर बांधताना किंवा दुरुस्ती करतानादेखील हैराण होतो. या वस्तुस्थितीचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचार करावा , असे इ-मेलने पाठवलेल्या या निवेदनात शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील यांनी म्हटले आहे.