पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे शेतीचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी एक तरुण शेतकरी शेतात गेला. मात्र पुराच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील वरखेडी येथील हि घटना आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वरखेडी येथील ३५ वर्षीय सतिश मोहन चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी व पोस्टात खात्यात नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सतीश चौधरी यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. रविवारी २१ व २२ सप्टेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे आपल्या शेतातील शेत मालाचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी ते सकाळीच शेताकडे गेले.(केसीएन)ते शेतात असतानाच जोरदार पाऊस सुरु झाला. जोरदार पावसामुळे ते एका झाडाखाली थांबले. पावसाचा जोर कमी झाला असता ते सांगवी गावाच्या रस्त्याने घरी वरखेडी येथे येत होते. त्याचवेळी सांगवी, वरखेडी शिवरस्त्याच्या नाल्याला अचानकपणे मोठा पुर आला. या पुराच्या पाण्यात सतीश चौधरी हे वाहून गेले.
आज सकाळी वरखेडी बाजारपेठेतील शनी मंदिराजवळ पुराच्या पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तेव्हा गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यात जाऊन पाहिले असता तो मृतदेह सतीश मोहन चौधरी यांचा असल्याचे उघड झाले. ही वार्ता वरखेडी गावात पसरताच वरखेडी गावावर शोककळा पसरली आहे. मयत सतीश मोहन चौधरी हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे वडीलही पोस्ट विभागात पोस्टमन म्हणून काम करत होते. वरखेडी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, सतीश मोहन चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी असून परिवाराला तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.