युवराज कोळी खून प्रकरणात संतप्त जमावाने दुचाकीसह हॉटेल जाळली
जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथील घटनेप्रकरणी दोघांचा शोध सुरु
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारात शुक्रवारी सकाळी झालेल्या युवराज कोळी यांच्या खून प्रकरणात एलसीबीच्या पथकाने संशयित देवेंद्र उर्फ देवा पाटील याला अटक केली आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे. २०२१ साली कोविड काळात घडलेल्या घटनेचे पडसाद ४ वर्षांनी शुक्रवारी उमटले. त्याचे पर्यवसान थेट खून प्रकरणातच झाल्याचे फिर्यादीतून दिसून आले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने संशयित आरोपींची घटनास्थळावरील दुचाकी व शेळगाव येथील हॉटेल पेटवून देत जाळपोळ केली आहे.
मयत युवराज यांचे वडील सोपान रामकृष्ण कोळी (वय ७४ वर्ष) यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मयत युवराज कोळी हे २०२१-२२ पर्यंत शेळगाव कानसवाडा येथील ग्रुप ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदावर कार्यरत होते. २०२१ साली कोविडची साथ चालू असताना संशयित आरोपी भरत भास्कर पाटील व त्याचा मुलगा परेश भरत पाटील हे कानसवाडा शिवारातील धनाई परमिट रूम व बिअर बार शासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवत होते.(केसीएन)त्यामुळे उपसरपंच म्हणून युवराज कोळी हे त्यांना बोलण्यास गेले असताना हॉटेल मालक भरत पाटील व त्यांचा मुलगा परेश यांनी युवराज कोळी याला, तू आमच्या नादी लागू नकोस. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर युवराज कोळी याच्याशी भरत पाटील व त्याचा मुलगा परेश हे नेहमी वाद घालत होते.
गुरुवारी दि. २० मार्च रोजी रात्री ८ ते साडेआठ वाजता भादली बुद्रुक गावाच्या पुढे पाटचारी रोडावर युवराज कोळी हे उभे असताना संशयित भरत पाटील तेथे आले व म्हणाले की, तू उपसरपंच असताना गावातील गटारी व रोडाची कामे केली नाहीत. असे सांगून त्यांनी शिवीगाळ केली. त्यावेळेला युवराज कोळी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.(केसीएन)पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा युवराज कोळी याला संशयित भरत पाटील यांनी, मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तिथून निघून गेला होता. याबाबतची माहिती युवराज कोळी यांनी परिवाराला दिली होती. त्यानंतर शुक्रवारी दि. २१ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी सोपान कोळी, मयत युवराज कोळी असे कानसवाडा शिवारातील शेतातील नवीन गोठ्याचे बांधकाम करीत होते.
त्यावेळेला शेळगाव येथील संशयित आरोपी परेश भरत पाटील, त्याचा भाऊ देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील आणि त्यांचे वडील भरत भास्कर पाटील असे कानसवाडा येथील शेतात दुचाकीने आले. युवराज कोळी यांच्याशी ग्रामपंचायतच्या जुन्या वादावरून भांडण करू लागले. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी वडील सोपान कोळी हे प्रयत्न करीत होते. त्यावेळेला युवराज कोळी याला भरत पाटील व देवेंद्र पाटील यांनी धरून ठेवले. परेश पाटील याने त्याच्या हातातील धारदार तीक्ष्ण हत्याराने युवराज कोळी यांच्या छातीवर वार केले.(केसीएन)यावेळी शेजारच्या शेतात काम करीत असलेले ग्रामस्थ धावत आले. लोकांना येत असल्याचे पाहून संशयित आरोपी परेश पाटील भरत पाटील व देवेंद्र पाटील हे त्यांची दुचाकी जागेवरच सोडून पळून गेले. त्यांचा काही शेतकऱ्यांनी पाठलाग केला. पण ते पसार झाले. यानंतर काही शेतकऱ्यांच्या मदतीने पॅजो रिक्षामध्ये जखमी युवराज कोळी यांना टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तिथे तपासणीअंति त्यांना मयत घोषित करण्यात आले, अशी फिर्याद सोपान कोळी यांनी दिली आहे. यानुसार नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील या संशयित आरोपीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे.