महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभावी पणे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी आज बुधवारी दिले.
सेवा हक्क पंधरवडा निमित्ताने महावितरण कडून विविध सेवा वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वीज सेवा विहित कालावधीत वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात यावी, या कामी हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वीज ग्राहकांच्या सोयीसाठी राज्य शासनाने महावितरण पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे निराकरण विहित कालावधीत करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केले.
बैठकीत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या सह विविध मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता उपस्थित होते. तत्पूर्वी गोदरेज हिल परिसरातील प्रादेशिक कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवा पंधरवडा निमित्ताने शपथ दिली.राज्य शासनाच्या सेवा हक्क कायदयात महावितरण कंपनीच्या काही सेवांचा समावेश करण्यात आला आहे.या सेवा वीज ग्राहकांना विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यात यावी, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक जगदाळे यांनी केले.
यावेळी अधीक्षक अभियंता निलकमल चौधरी, कैलास दुध बर्वे, मोहन काळोखे, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) योगेश खैरनार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) हवीषा जगताप, उपस्थित होते. कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ आणि मंडळ कार्यालयात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.