जळगाव रेल्वेस्थानकावर सुरक्षा बलाच्या पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने “ऑपरेशन नार्कोस” अंतर्गत मोठी कारवाई करत १ लाख २३ हजार रुपये किमतीचा, ८ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्यांना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दि. ४ जून रोजी दुपारी १:३० वाजता जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एका संशयास्पद व्यक्तीला थांबवण्यात आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील काळ्या बॅगेतून गांजासारखा उग्र वास येत असल्याने अधिक तपासणी करण्यात आली. तपासात त्याने आपले नाव झबीउल्ला समीउल्ला (वय २७, रा. टँक मोहल्ला, मोदी रोड, बेंगळुरू, कर्नाटक) असे सांगितले. त्याने बॅगमध्ये गांजा असल्याचे कबूल केले आणि तो कर्नाटक एक्सप्रेसने बेंगळुरूला नेण्याच्या तयारीत होता असेही सांगितले. यासोबतच, गांजा वाहतुकीत सहभागी असलेला भीमसिंह मालसिंग बारेला (वय ४२, रा. कुंड्यापाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) यालाही रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली.
तत्काळ वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देण्यात आली. सहायक सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांनी घटनास्थळी येऊन कारवाई करण्यात आले. स्टेशनचे अधिकारी विलास फालक यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक काट्याने गांजाचे वजन करण्यात आले. अटकेतील दोन्ही आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल भुसावळ आरपीएफ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त आणि सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक प्रफुल्ल खर्चे, हेड कॉन्स्टेबल सुशील मराठे, गोपाल जाधव आणि कॉन्स्टेबल मनोज मौर्य, कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी सक्रिय सहभाग घेतला.