जळगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर येथे महायुती उमेदवारांना धोका
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात अधिकृत व अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज माघारीच्या अंतिम दिवशी लढतींचे खरे चित्र स्पष्ट झाले. काही मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षाचे राज्यभरात “संकटमोचक”म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांना अखेर स्वतःच्याच जळगाव जिल्ह्यात मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. बंडखोर कार्यकर्त्यांनी अखेर माघार न घेता रिंगणात कायम राहिल्याने “संकटमोचकां”ची मनधरणी अखेर निष्फळ ठरली आहे.
राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना बहुमतापेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अडथळा म्हणजे काही भाजपचे बंडखोर कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी महायुतीच्याच उमेदवारांविरुद्ध दाखल केली आहे. (केपीएन)आज दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम तारीख असून दुपारी ३ वाजेपर्यंत बंडखोरांनी अजिबात माघार घेतली नाही. भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांची राज्यभरात संकटमोचक म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात जळगाव शहर, एरंडोल, पारोळा, पाचोरा, अमळनेर अशा महत्त्वाच्या ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. त्यात चोपड्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी देखील मिळवली आहे.
काहींना फोनवर संपर्क केले, काहींना प्रत्यक्ष बोलावले होते. मनधरणी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र माघारीच्या अखेरच्या दिवशी संकटमोचक परीक्षेत नापास झाले असून बंडखोर कार्यकर्ते रिंगणात कायम राहिले आहे. यात प्रमुख बंडखोरांमध्ये जळगावात अश्विन सोनवणे, मयूर कापसे, पारोळा-एरंडोल येथे माजी खा. ए. टी. पाटील, पाचोरा येथे अमोल शिंदे, अमळनेर येथे भाजप समर्थक शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.