आध्यात्मिक आणि भौतिक जगात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर नकारात्मक विचार फेकून द्यावे व त्या जागी सकारात्मक विचार आणि ऊर्जेने ओतप्रोत व्हावे. आय कॅन डू म्हणजे मी करू शकतो आणि आय विल डू म्हणजे मी हे करीनच असा सकारात्मक विचार ठेऊन जर काम केले तर तसे घडून येते त्यामुळे जीवनात सकारात्मक विचारांचा स्वीकार करावा म्हणजे आपले उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो याबाबत प.पू. सुमित मुनि जी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून सांगितले.
माणसाच्या मनात दिवसाला ६० हजार विचार येऊन जातात. त्यात काही विचार सकारात्मक तर काही नकारात्मक असतात. आगम मध्ये देखील सकारात्मक व नकारात्मक विचारांबद्दल सांगण्यात आलेले आहे. नरक विचार म्हणजेच नकारात्मक विचार आणि अधोगामी (खाली नेणारे) उर्ध्वगामी म्हणजे (वर नेणारे) सकारात्मक विचार अशा दोन प्रकारच्या विचारांचे अस्तित्व असते. सकारात्मक विचार उंचीला नेणारे ठरतात. कपडा मळलेला असेल तर त्याला कितीही रंगवा तो चांगला दिसणार नाही त्या कपड्याला स्वच्छ करावे लागेल तसेच आपल्या मनाचे देखील असते. आपल्या मनात सकारात्मक, ऊर्जावान विचार असतील तर ते व्यक्तीमत्त्व यशस्वी ठरते या बाबतचा संदर्भ आचारांग सूत्र मध्ये दिलेला आहे. सकारात्मकता कशी लाभकारी असते याविषयी महाभारतकालीन उदाहरण सांगितले. पद्मनाभ राजाने द्रौपदीला पळवून नेले होते. सहा महिन्यात मला सोडविण्यासाठी श्रीकृष्ण आणि पांडव येतील असा विश्वास द्रौपदीच्या मनात होता. पद्मनाभ राजाला मारू किंवा आम्ही मरू असा विचार पांडवांनी केला परंतु त्यांना यश मिळाले नाही. मी पद्मनाभ राजाला हरवीन हा विचार करून कृष्ण मैदानात उतरले तर कृष्ण यशस्वी झाले. सकारात्मकता आपल्याला यश मिळवून देते त्यामुळे मनात नेहमी सकारात्मकता ठेवा असा मोलाचा सल्ला महाराज साहेबांनी दिला.