आपण कुणाच्या संगतीत आहोत यावरून देखील आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख समोरच्याला होत असते. त्यामुळे अज्ञानींच्या संगतीमध्ये राहू नये. अज्ञानी व्यक्ती आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात. त्यामुळे नेहमी संगत चांगल्या, ज्ञानी व्यक्तींची असावी. ‘सज्जनांची संगत तर जीवन उन्नत!’ हे साधे सोपे सूत्र कायम ध्यानात ठेवावे असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी प्रवचनातून केले.
अज्ञानी व्यक्ती स्वतः जसे वागतात तसेच आपल्या अवतीभोवती असलेल्यांना सन्मार्गापासून दूर कुमार्गात आणून सोडतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संगतीचा प्रभाव पडत असतो. व्यक्तीचा प्रभाव पडो अथवा न पडो परंतु त्याचे भाव मात्र चांगले असायला हवेत. अलीकडे अज्ञानींचा अधिक बोलबाला दिसतो. भले ते शैक्षणिक दृष्ट्या पीएचडी पर्यंत शिकलेले असतील पण ते आध्यात्मिक दृष्ट्या अज्ञानी ठरतात, या उलट जे शैक्षणिक दृष्टीने मुळीच शिकलेले नसतील परंतु ते आध्यात्मिक दृष्ट्या मोठे ज्ञानी ठरतात. दोस्ती वा सोबतीसाठी म्हणून मूर्ख व्यक्ती ज्ञानी व्यक्तीला नव्हे तर आपल्या सारख्या मूर्ख व्यक्तीच्या शोधात असते. अलीकडे आपल्याला सहज मूर्ख बनविले जात आहे. फ्री अर्थात फुकट मिळत आहे म्हणून त्यामागे लागतो. खरे तर कुणी कुणाला काहीही फुकट देत नसते परंतु आपण फुकट मिळते आहे म्हणून मूर्ख बनतो. सोशल मीडिया फुकट उपलब्ध असतो परंतु हाच सोशल मीडिया आपली खासगी गोष्ट, आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेते. आपल्या फोनमधील डाटा त्या कंपनी विकतात. आपण स्वतः व पुढील पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या मुलांना यापासून वाचवा असा मोलाचा संदेश देखील प.पू. महाराज साहेबांनी दिला. परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उत्तराध्यायन सुत्रच्या अध्यायांचा गोषवारा समजावून सांगत असलेल्या श्रुंखलेमध्ये आज ३० व्या अध्यायातील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. तप विषयक माहिती त्यांनी सांगत त्याचे महत्त्व, तपाचे बाह्य व आभ्यंतर तप प्रकार याबाबत सविस्तर चर्चा केली .