तालुका कृषी अधिकाऱ्यांची माहिती
रावेर ( प्रतिनिधी ) : – शनिवार व रविवारी वादळी पावसाने रावेर तालुक्यातील ३४२ हेक्टर केळीबागा जमीनदोस्त झाल्या. यामुळे १५ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
खिर्डी बु, खिर्डी खुर्द, रेंभोटा, वाघाडी, बलवाडी, तांदलवाडी, निंभोरा बु,, विवरे बु, विवरे खुर्द, वाघोदा बु., मस्कावद बु, मस्कावद खुर्द, मस्कावद सीम, दसनूर, सिंगनूर, सावदा, कोचूर बु., कोचूर खुर्द, रोझोदा, खिरोदा प्र यावल, जानोरी, रावेर, ऐनपूर, निंबोललोहारा, कळमोदा, कुंभारखेडा, सावखेडा, कुसुंबा, मुंजलवाडी, उटखेडा, भाटखेडा,, खिरवड, पुनखेडा व पातोंडी शिवारातील ६८६ केळीबागा जमीनदोस्त झाल्या. यामुळे १५ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके व तहसीलदार बंडू कापसे यांनी वर्तवला आहे.
वादळी पावसाच्या तांडवात रावेर पोलिस स्टेशनच्या आवारातील तसेच कुसुंबा – मुंजलवाडी रस्त्यावर, विवरे बु. ते खुर्द महामार्गावर तथा मस्कावद – वाघोदा रस्त्यावर झाडे उन्मळून रहदारी ठप्प झाली होती. मस्कावद येथील एका चारचाकीवर झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. रावेरचे फौजदार घनश्याम तांबे व फौजदार राठोड यांनी पोलिस कुमक घेऊन कुसुंबा रस्त्यावरील दोन झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, झाडे उन्मळून वा फांद्या तुटून तारांवर पडल्याने तार तुटून व खांब वाकून – तुटून वीजपुरवठा खंडित होऊन वरील प्रभावित गावे रात्री उशिरापर्यंत अंधारात होती. दरम्यान, मोठा वाघोदा येथेही केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावरील काही झाडेही पडली. यामुळे वीजपुरवठा बराच वेळ खंडित होता.