प्रतापनगरातील केंद्राच्या अध्यक्षांची धक्कादायक माहिती
भ्रष्टाचाराच्या आरोपांचे केले तोंडी खंडन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील प्रतापनगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील आरोप-प्रत्यारोपांत आता दुसऱ्या गटाने देखील गुरुवारी १४ रोजी पत्रकार परिषद घेतली. जळगावचा ट्रस्ट हा प्रत्यक्ष व कायदेशीर दिंडोरी प्रणित नसला तरी आम्ही एका ठरावाद्वारे तो दिंडोरी प्रणित केला आहे. येथील व्यवहार हा चेकद्वारे चालतो, त्यामुळे गैरव्यवहार होत नाही, अशी माहिती देण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीतील पैसे हे दिंडोरीतील गुरुपीठाला जातात, जळगावच्या केंद्रातून दर महिन्याला ३० हजारापर्यंत पैसे गुरुपीठाला पाठवितो अशी खळबळजनक माहिती अध्यक्ष बी.एम. पाटील यांनी दिली. तसेच, पत्रकारांनी कागदपत्रे पाहून बातमी प्रकाशित करावी असा सल्ला या दुसऱ्या गटाने पत्रकारांना दिला खरा, मात्र त्यांनी स्वतःच कुठलेही कागदपत्रे पत्रकारांना दिले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार होत नाही हे ते फक्त तोंडीच सांगू शकले.
नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काही तथाकथित सेवेकरी हे स्वयंघोषित अध्यक्ष व उपाध्यक्ष होऊन ट्र्स्टचा कारभार बेकायदेशीरपणे करीत असून तेथे गैरव्यवहार करीत आहेत, असा आरोप केला होता. त्यावर दुसऱ्या गटातर्फे गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष बी.एम. पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. प्रवीण पुरभे, ॲड. केतन ढाके, ॲड. रमाकांत सपकाळे आदी उपस्थित होते. अध्यक्ष बी. एम. पाटील यांनी, सेवेकऱ्यांचे आरोप फेटाळून लावत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही अशी माहिती दिली. ज्यांनी आरोप केले त्यांना केंद्रातून काढून टाकले आहे, असे सांगितले.
कायदेशीर सल्लागार ॲड. प्रवीण पुरभे यांनी सांगितले की, ट्रस्टच्या घटनेत दिंडोरी प्रणित हा शब्द नाही. मात्र आम्ही तसा ठराव केलेला आहे. येथील पैसे गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरला जातो हा आरोप खोटा असून आम्ही तो त्यांना “दान” म्हणून देत असतो. मात्र, गुरुपीठाला जर पैसे दान देत असतील तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, दिंडोरीच्या गुरुपीठाच्या ट्रस्टला दान देण्याची गरज आहे काय ? तसा दान देण्याबाबत ठराव आहे का ? आतापर्यंत कितीवेळा व किती पैसे दान देण्यात आले ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. तसेच, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ श्रीमंत असतील तर त्यांना जळगावच्या ट्रस्टच्या दान पैशांची आवश्यकता आहे काय ? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
प्रतापनगरातील केंद्रात सेवेकऱ्यांकडून साधारण १०० किलो तूप मिळते. त्यातील जे उरते ते आम्ही गुरुपीठाला पाठवतो, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. मात्र गुरुपीठाला तूप पाठविण्याची गरज काय ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तसेच, जुनेच ट्रस्ट कारभार हाकत आहे, त्याविषयी अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. तुमचेच विश्वस्त मंडळ आम्हाला हवे अशी मागणी त्यावेळेला सेवेकऱ्यांनी केली होती. त्यामुळे आम्हीच केंद्राचे काम पाहतो अशी माहिती बी. एम. पाटील यांनी दिली. तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांवर आम्ही फौजदारी किंवा दिवाणी खटला दाखल करू असा इशाराही कायदेशीर सल्लागार ॲड. प्रवीण पुरभे यांनी दिला.