काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती
ठाणे (वृत्तसेवा) : राज्यात आता सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना सांगितले आहे. आमची कुठलीही अडचण नाही भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य राहील, अशी माहिती पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळेला त्यांनी सांगितले की, शिवसेना रडणारी नाही. लढणारी आहे. गेल्या अडीच वर्षात सीएम म्हणजेच कॉमन मॅन म्हणून मी काम केले. सर्व घटकांना मदत केली पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरलो. मी आनंदी व खुश आहे. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे मार्गदर्शन सोबत होते. भाजपने मुख्यमंत्री म्हणून मला अडीच वर्ष संधी दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे.
या निवडणुकीत मतांचा महायुतीवर वर्षाव झाला. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. सत्ता स्थापनेसाठी मी कुठेही ताणून धरलेले नाही. लाडका भाऊ म्हणून माझी झालेली ओळख ही माझ्यासाठी मोठी आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कळवून दिले आहे. सरकार बनवताना माझ्यामुळे अडचण येत असेल, असे कुठेही मनात आणू नका. तुम्ही घेतलेले निर्णय शिवसेनेला व मला अंतिम राहील असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उद्या गुरुवारी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे बैठक आहे त्या बैठकीतच पुढील निर्णय घेतला जाईल अशी ही माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
तर ईव्हीएम घोटाळ्याबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की, विरोधक रडीचा डाव खेळत आहे. झारखंडमध्ये आणि लोकसभा निवडणुकीवेळी यांना ईव्हीएम घोटाळा वाटला नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले. दरम्यान शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी मात्र शिंदेंवर टीका केली आहे. दिल्लीच्या हुकूमशहांसमोर एकनाथ शिंदे यांनी गुडघे टेकले अशी प्रतिक्रिया आता विरोधी पक्षांमधून उमटू लागली आहे.