भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरणगाव परीसरात रात्रीपासून संततधार पावसामुळे आयुध निर्माणीकडे जाणाऱ्या लवकी नाल्याला पूर आला. त्यात रविवारी सकाळी ड्युटीवर जात असलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वरणगाव पोलिसांनी याबाबत नोंद केली आहे.
शुभम बबलु तायडे (वय २३, रा. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. वरणगाव आणि परीसरात शनिवार रात्रीपासुन पावसाची संततधार सुरु होती. यामुळे नदी, नाले तुडूंब वाहत होते. शुभम तायडे आयुध निर्माणीमध्ये दरबान म्हणून नोकरीवर होता. रविवारी शुभम सकाळी भुसावळ आनंदनगर येथुन नित्यनियमाप्रमाणे मोटरसायकलने कामावर निघाला. मात्र वरणगाव शहराबाहेर एक किमी अंतरावर असलेल्या लवकी नाल्यावरील पुलावरुन पुराचे पाणी ओसंडुन वाहत होते. दरम्यान शुभमने दुचाकीसह पुल पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकीसह तो वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.
तरुण वाहून गेल्याची माहिती समजताच आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर अजयकुमार, कर्नल वैद्य, कर्नल चौधरी, आयुध निर्माणी युनियनचे महेश पाटील, योगेश सुर्यवंशी, रवि सपकाळे आणि दरबान कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. घटनेची माहिती वरणगाव पोलिस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर नाल्याच्या दोन्ही काठावरून तरुणाचा शोध घेण्यात आला. परंतु पाच तास शोध लागला नाही. शहरातील पट्टीचे पोहणारे राजेंद्र माळी यांनी नाल्यातील वाहत्या पाण्यात जाऊन शोध घेतला असता अवघ्या १०० मीटर अंतरावर शुभमचा मृतदेह काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वरणगाव ग्रामिण रुग्णालयात आणला. वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.