भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ स्थानकावरून धावणार्या विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडून कॅश तसेच ऑनलाईन रक्कम लुबाडणार्या तृतीयपंथीयांच्या ८ संशयीतांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे परप्रांतीय प्रवाशांना टार्गेट करीत हे तृतीयपंथी धमकावत होते. शिवाय कॅश नाही म्हणणार्या प्रवाशांपुढे स्कॅनर पुढे करीत शंभर ते दोनशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने वसुल करीत होते. आरोपींच्या फोन पे रेकॉर्डमध्ये अनेक ट्रान्झेक्शन अशा पद्धत्तीने आढळले आहेत. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आणि रेल्वे हेल्पलाईनवर या त्रासाची तक्रार केली होती.
रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एन. राय (क्राईम ब्रांच) आणि निरीक्षक पी.आर. मीना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २५ आणि २६ जूनच्या रात्री पथकाने भुसावळ मार्गावरील गाड्यांमध्ये धडक कारवाई करीत ६ तृतीयपंथी आणि त्यांच्या दोन मुख्य चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले.
गुरुवारी भुसावळ न्यायालयात ४ तृतीयपंथी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना हजर करण्यात आल्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्यांना १ महिन्याची शिक्षा सुनावली. संशयीतांना जळगाव कारागृहात हलवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य असून यापुढेदेखील रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई सुरूच राहील, असे रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी म्हणाले.