भाजप चाळीसगाव शहराध्यक्षांचा खळबळजनक आरोप,
चाळीसगाव ( प्रतिनिधी) – 2019च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती मात्र खा उन्मेष पाटील यांनी मित्रत्वाला तडा देत आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक षडयंत्रे रचली असा खळबळजनक आणि खुला आरोप भाजपाचे चाळीसगाव शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना लिहीलेल्या पत्रात केला आहे.
सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. पक्षात आजपर्यंत जी गटबाजी लपून होती किंवा फक्त चर्चेत होती ती आपण उघड केली असा आरोपही घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे. भाजपा शहराध्यक्षांकडूनच झालेल्या या आरोपामुळे खा उन्मेष पाटील व आ मंगेश चव्हाण यांच्यातील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
भाजपा चाळीसगाव शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी म्हटले आहे की, 2014 साली भाजपाच्या उमेदवारीच्या बळावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उन्मेष पाटील आमदार झाले आमदार झाल्यानंतर चाळीसगाव शहराचे चित्र बदलेल अशी नागरीकांची अपेक्षा होती. त्याचाच भाग म्हणून 45 वर्षाची शहर विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आणून लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक निवडून दिले. त्यात मीही होतो. 2016मध्ये मी शहराध्यक्ष झालो. आपल्या नेतृत्वाखाली काम करतांना आम्ही एकेक कार्यकर्ता जोडत होतो, या दरम्यानच्या काळात आपण मात्र जुन्या जाणत्या लोकांना बाजुला सारत होता. 2019मध्ये लोकसभा निवडणूकीत पक्षाने आपल्याला मोठी जबाबदारी दिली. घरच्या भाकरी खात कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार करून निवडून आणले. आपण एकही दिवस प्रचारासाठी आले नसतांना सामान्य कार्यकर्त्यांने तालुक्यच्या शेवटच्या टोकापर्यंत जावून प्रचार केला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत खासदार पाटील यांचे विश्वासू साथीदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्यावेळी उन्मेष पाटील आपल्या मित्रांसाठी शिफारस करतील असे वाटले होते पण शिफारस तर दुरच आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक कट कारस्थान रचले याची चर्चा तालु्नयासह संपूर्ण जिल्ह्यात होती. आपला विरोध असतांनाही मंगेश चव्हाण निवडून आले. वेळेच्या प्रवाहात तालु्नयात कधी गटबाजी आणि दुफळी निर्माण झाली हे आम्हालाही कळाले नाही. आज आपणासह सर्व सामान्य कार्यकर्त्यांला खासदार गटाचा की आमदार गटाचा असे विचारतात. अशावेळी आम्ही कमळाचेच म्हणजे भाजपाचे असे उत्तर द्यावे लागते असे भाजपा शहराध्यक्ष म्हणतात.
आगामी काळात निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहीजे होती. नुकतेच शहरात जे कोरोना लसीकरण शिबिर घेतले त्यात वेगळे चित्र पहावयास मिळाले. पक्षात जी गटबाजी लपून होती वा फक्त चर्चेत होती ती आपण उघड केली. बॅनरवर ना कमळ घेतले ना पक्षाचा प्रोटोकॉल. एवढेच नव्हे तर लसीकरण आयोजनाच्या काही ठिकाणच्या बॅनरवर भाजपाच्या खासदारांसह विरोधी पक्षांच्या काही लोकांचे एकत्रित फोटो होते. यावरून नेमके काय समजायचे? या गोष्टींमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मलाच काय पक्षाच्या एकाही पदाधिकारी तसेच नगरसेवकास विचारात घेतले नाही. खरेतर लसीकरणाची सुरूवात आमदार गिरीश महाजन यांनी सर्वप्रथम जामनेरमधून केली. उन्मेष पाटील हे जिल्ह्याचे खासदार असतांना लसीकरण शिबिर फक्त चाळीसगाव तालु्नयातच घेण्याचा उद्देश काय असा सवाल घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे. आपण करीत असलेल्या हालचालींमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत. आहात सामान्य कार्यकर्ता आपणास चाललेल्या या सर्व प्रकारावर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही घृष्णेश्वर पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रात केल्याने चाळीसगाव तालु्नयासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणूकीपासून खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात धुसफूस आहे वेळोवेळी त्याचा प्रत्ययही आला. आता चक्क भाजपा शहराध्यक्षांनीच लावलेल्या आरोपामुळे हा संघर्ष अधिकच चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. या बाबत खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.